मी माझ्या गावी गेले होते माझ्या चुलत भावाच्या लग्नासाठी.. तिथेच मला माझ्या दूरची मामेबहीण दिसली.. जरा चिंतेतच दिसत होती.. कितीही नॉर्मल वागायचा प्रयत्न करत असली तरी कपाळावरच्या आठ्या काही लपवू शकली नाही... पण मी नॉर्मलच बोलायला सुरवात केली.. सुरवातीला मोकळेपणे काही बोलली नाही .. पण हळूहळू गप्पा रंगात आल्यावर तिने बोलायला सुरवात केली..तिच्या लग्नाला 5 वर्ष झाली पण मुलं बाळ नाही म्हणून नवरा नाराज आहे.. तिची सासू रोज त्याचे कान भरते कि तिला सोडून दे तिचा तसाही काही उपयोग नाही असे सतत नवऱ्याच्या मनावर बिंबवत असते.. तिला हे बोलणे ऐकून खूप वाईट वाटते.. तिला मूल होत नाही यात तिची काय चूक?? २ वर्षांपूर्वी मोठ्या आजारातून जेमतेम बचावली.. पोटाची मोठी ऑपरेशन्स झालीत.. डॉक्टर तिला म्हणतात कि बाळासाठी इतक्यात प्रयत्न करू नका कारण तुमच्या आणि तुमच्या होणाऱ्या जीवाला पण धोका असू शकतो.. हे ऐकल्यावर कोणती स्त्री हे करायला धजावेल? तिला हेच वाटत होते कि आपल्यामुळे त्या चिमुकल्याच्या जीवाला धोका कशाला??
पण हे समजून घेणार कोण? तिच्या सासरचे मात्र तिच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याऐवजी;तिचा मानसिक छळ करत आहेत.. आणि या गोष्टी तिला तिच्या भूतकाळातील त्या भयंकर आजाराची जाणीव करून देतात.. कळत नकळत का होईना सासूसासऱ्यांचा जाच हे पण एक कारण होते तिच्या त्या भयंकर आजाराचे..सतत दडपणात असायची ती.. देवाच्या कृपेने ती त्यातून सहीसलामत बाहेर आली खरी पण आता काय?? परत ती दपणाखाली जगणार?? परत ती त्या आजाराच्या तावडीत सापडणार?? देव च जाणे.. एवढी सुशील आणि नम्र मुलगी.. तिच्या वाटेमध्ये आलेले बाभळीचे काटे काळीज सोलवटून टाकतात .. आणि यामध्ये मी काहीच करू शकत नाही याचे सल नेहमी बोचत राहील .. पण तिला धीर देण्याशिवाय मी काहीच करू शकत नाही..